भारतीय संस्कृतीचे जन होणे आवश्यक : मीनाक्षी लेखी
वितस्था महोत्सवात पुणेकरांशी साधला संवाद : कलाकारांचे केले कौतुक
पुणे : देशवासीय कोणत्याही परंपरेतून आले असले तरी मी ‘अनेकता मे एकता' मानते. नृत्य-नाट्य-गायनादी कलासंस्कृती भारताला पूर्वापार माहित होती. त्यामुळे देशाची सांस्कृतिक परंपरा प्राचीन आहे. भारतीय संस्कृतीकडे दुर्लक्ष होणे ही गोष्ट दु:खदायक आहे. भारतीय संस्कृतीचे जतन होणे आवश्यक आहे. पूर्ण काश्मीर भारताचा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी केले. संस्कृत सर्व भारतीय भाषांची जननी आहे, असेही त्यांनी नमूद केले.
केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वितस्था (काश्मीर) महोत्सवात आज (दि. 1 एप्रिल) सायंकाळी लेखी यांनी भेट देत कलाकार आणि पुणेकर रसिकांशी संवाद साधला. त्या वेळी त्या बोलत होत्या. काश्मिरी संस्कृतीचे अभ्यासक आणि वितस्था महोत्सवाचे नॉलेज पार्टनर सिद्धार्थ काक, एमआयटी पीस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, आझादी का अमृत महोत्सवाच्या संचालिका प्रियंका चंद्रा, एमआयटी पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवाडकर व्यासपीठावर होते. प्रमुख अतिथींनी कलाकारांचे सादरीकरण पाहून आनंद व्यक्त करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.
लेखी पुढे म्हणाल्या, देशाच्या परंपरेला जाणण्यासाठी एक जन्म पुरेसा नाही. भारतीय संस्कृतीची, सभ्यतेची संपूर्ण देशाला माहिती करून देणे आवश्यक आहे. यासाठी वितस्था महोत्सव उपयोगी ठरेल. वितस्था ही काश्मीरची जननी असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, भारतीय तत्त्वज्ञान, परंपरा, संस्कृती यांचे जतन करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करणे महत्त्वाचे वाटते. भारतीय संस्कृतीचे सुंदर दर्शन या महोत्सवाच्या निमित्ताने झाले. विदेशी संस्कृतीच्या मागे न लागता अतिप्राचिन भारतीय संस्कृतीचे महत्त्व युवा पिढीने जाणणे आवश्यक आहे.
वितस्था उत्सवाच्या आयोजनाविषयी आझादी का अमृत महोत्सवाच्या संचालिका प्रियंका चंद्रा यांनी माहिती दिली.
मान्यवरांचे स्वागत प्रियंका चंद्रा यांनी केले. एमआयटीतर्फे उपस्थित मान्यवरांचे स्वागत डॉ. विश्वनाथ कराड यांनी केले.
0 comments:
Post a Comment