काजळी नदी साखरपा या गावातून वाहते. चिपळूणच्या वशिष्ठी नदीएवढा तिचा विस्तार नाही, पण अत्यंत वेगाने पश्चिम घाटातून आंबा घाटातून ती वाहत येते आणि वेगाने जाऊन रत्नागिरीच्या समुद्राला मिळते. येताना वरून मोठे दगड-धोंडे नदीतून वाहत येतात गाळाच्या स्वरूपामध्ये आणि त्यांनी नदीचे पात्र उंचावले. या नदीच्या दोन्ही बाजूंना गाव आणि बाजारपेठ आहे. उथळ झालेल्या पात्रामुळे गावाला पुराचा धोका निर्माण झाला होता. मागील काही वर्षापूर्वी म्हणजे 2005 च्या पुरात गावकऱ्यांचे खूप हाल झाले. 2019 साली गावच्या लोकांनी एकत्र येऊन या प्रश्नावर तोडगा काढता येईल का याची चर्चा केली. यासाठी जलनायक डॉक्टर अजित गोखले यांचेशी संपर्क साधला. नदीचा शास्त्रीय अभ्यास केला आणि नेमके काय काम करायचे हे निश्चित केले. त्याची दिशाही ठरली. नाम फौंडेशनने विनामूल्य खोदयंत्र (पोकलेन) उपलब्ध करून दिले आणि गावकऱ्यांनी इंधनाचा खर्च केला.
लोकसहभागातून काही निधी उभारला, पण १२ लाखाचे कर्जदेखील या कामासाठी घ्यायला लागले. असे एकूण ३५ लाख रुपये खर्च आला. सुमारे एक किलोमीटरच्या परिसरात नदीचे पात्र खोल करून गाळ काढण्यात आला. खोली ४ मीटर करण्यात आली. पात्र दीडशे फूट रुंद करण्यात आले. मुग्धा सरदेशपांडे, प्रसाद सरदेशपांडे, गिरीश सरदेशपांडे, श्रीधर कबनुरकर तसेच नाम फाउंडेशन च्या सहकार्याने गावकऱ्यांनी हे आव्हान पेलले . कोविड, लॉकडाऊन सारखे अनेक अडथळे पार करून गाव इथपर्यंत पोचले आहे . अजून ४ वर्ष काम करीत राहावे लागणार आहे.
मे अखेर काम संपलं पण त्या कामानेदेखील आज साखरपा या गावाला पुराची दाहकता तेवढे जाणवली नाही. म्हणजे थोडक्यात स्थानिक स्तरावरील लोकांनी पुढाकार घेऊन तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन समाजाचे सहकार्य घेऊन काम केल्यास बदल निश्चित घडतो,असे जलसाक्षरता केंद्र यशदाचे माजी कार्यकारी संचालक डॉ सुमंत पांडे यांनी सांगितले .
डॉ अजित गोखले (संस्थापक, नॅचरल सोल्युशन्स) म्हणाले की कोकणातील 'हाय फॉल रेन एरिया' मध्ये काम करताना 'नाम फौडेशन'ला आम्ही तांत्रिक सल्ला देतो. साखरपा प्रकल्पात आमच्या 'नॅचरल सोल्युशन्स' टीमने तेच केले. कोकणात ७० वर्षातील वृक्षतोडीने नद्यात गाळ साठला आहे. त्या उथळ झाल्या आहेत. नद्या आता २०० फुट रुंद झाल्या आहेत. त्यामुळे पूर गावात येत आहेत. साखरप्यात हेच होत होते. साखरप्याचे सर्वेक्षण करून आराखडा केला. गावकऱ्यांनी काम केले आणि पूर गावात यायचा थांबला. कोकणात पावसाच्या पाण्याला वाहायला जागा केली पाहिजे पावसाळ्यानंतर पाणी अडवायला सुरुवात केली पाहिजे. इतर ठिकाणचे जलसंधारणाचे तंत्र कोकणात चालणार नाही. कोकणसाठी वेगळा विचार आणि तंत्र वापरले पाहिजे.
आता नुकताच वशिष्ठी नदीने आपल्या प्रकोपचे दर्शन घडवले आहे आणि चिपळूण शहरात आठ फूट उंच पाणी होते. त्यामुळे झालेली वित्त आणि मनुष्यहानी खूप दुःखद आहे. पण साखरप्याच्या गावकऱ्यांनी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. कोकणातील अनेक नद्यांसाठी हा आशेचा किरण नक्कीच आहे.
0 comments:
Post a Comment