Sunday, December 8, 2019

तिसऱ्या विचारभारती साहित्य संमेलनाचे उद्घाटन


पुणे ( वी..के ) –  जे जे छोट्या संमेलनातून गवसत़़ं, ते नेमके मोठ्या संमेलनातून निसटत. सध्याच्या काळात गोंगाट खूप वाढला आहे. मात्र माणसामाणसांतील संवाद हरविला आहे.विज्ञानाच्या प्रगती बरोबरच मानवी सहृदयता असायला हवीच. विचारभारतीसारखी संमेलने म्हणजे चौरंगावर मावणारी देवपूजाच आहे. यातून समाजात निर्माण झालेले सांस्कृतिक प्रदूषण दूर होईल असा विश्वाससुप्रसिद्ध लेखक कवी आणि विचारवंत प्रवीण दवणे यांनी व्यक्त केला.

भारतीय विचारसाधना पुणे प्रकाशन आणि विश्व संवाद केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सहकार्याने तिसऱ्या विचारभारती साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज प्रवीण दवणे यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अनुवादक उमा कुलकर्णी होत्या.
सध्या समाजात तुटलेपणा जाणवत आहे. अशा वातावरणात नुसते एकत्र दिसायला नको तर एकमेकात विरघळून जायला हवे.समृद्ध माणूस घडावा यासाठी अंतर्मनात साहित्याचे बैठक हवी.प्रकाशन संस्था पुस्तक निर्मितीतून हे काम करतात आणि अशी संमेलने त्यांचे सांस्कृतिक पालकत्व घडवतात. विचारभारती संमेलनाला अनुवादक अध्यक्ष असणे म्हणजे नदी जोड प्रकल्पा सारखे आहे. सर्व प्रांतातील भाषा आणि त्यांचे एकमेकीत सामावून जाणे यानिमिताने होत आहे. कितीही विज्ञान पुढे गेले तरी प्रकाशाची पूजा करायला हवी असेही ते म्हणाले.

सृजनातून येणारे साहित्य काळोखातून प्रकाशाकडे नेते. उत्तम साहित्य निसर्गाचे काम करते. असे साहित्य भविष्यातील भारताची पाठ्यपुस्तके व्हायला हवी. पण बुद्धिभेद करणाऱ्यांना अधिक बुद्धी दिली आहे कि काय अशी शंका येते. अंतर्भावना जागृत करण्याचे काम साहित्य करते. शब्दार्थाची लड बांधणारा अनुवादक होत नाही तर मूळ लेखकाची स्पंदने आणि तरंग जाणणारा अनुवादक होतो. असे सांगून उमलणारा समृद्ध दिवस आज ओंजळीत घातला असेही दवणे म्हणाले.

प्रसिद्ध लेखिका आणि अनुवादक उमा कुलकर्णी या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत. नवे लेखक नवी दिशा आणि नवा विचार हा उद्देश ठेवून भारतीय विचार साधना प्रकाशनाच्या वतीने यावेळी पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. माओवाद्यांचे आव्हान - लेखक ब्रिगेडीअर हेमंत महाजन, महात्मा फुले यांची उद्यमशीलता लेखक डॉ. जगदीश लांजेकर आणि त्रिदल हे डॉ. मंगला मिरासदार यांच्या पुस्तकाचे प्रकाशन प्रवीण दवणे आणि उमा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी दुसऱ्या सत्रात उमा कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत श्रीराम ओंक आणि केतकी जोशी यांनी घेतली. आजचा वाचक अधिक चोखंदळ आणि हुशार होत चालला आहे. त्यांची भूक भागविणे कोणत्याही एका भाषेला शक्य नाही.कोणतीही कलाकृती अनुवादित करताना तिला समर्पित व्हावे लागते. मग ती कलाकृती मूळ लेखकाची शैली समजून घेत आपोआप घडत जाते. मी वाचकांच्या बाजूची मराठी वाचक असल्याने वाचकांना काय हवंय याची जाणीव आहे. लेखकाची बलस्थाने माहिती असली कि तो अनुवाद सार्थ होतो. भैरप्पा,  कर्नाड यांच्यासारखे लेखक समजले इतकी ताकद अनुवादात आहे असे उमाताई म्हणाल्या.  

सोशल मेडिया वरील नुसते लाईक्सवरून हुरळून जाता पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया छोट्या पत्राने आली तर जास्त आनंद होतो. आजही पुस्तक वाचले जाते आहे आणि भरभरून प्रतिक्रिया येतात यातच प्रिंट मेडिया चे महत्व त्यांनी अधोरेखित केले. कानडी शिवाय इतर सीमाभागातील नागरिकांना खरे तर थोड्या मार्गदर्शनाची गरज आहे त्यातून इतर भारतीय भाषांमधील समृद्ध साहित्य मराठीत येईल. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मतही त्यानी यावेळी व्यक्त केले. शामा घोणसे यांनी प्रमुख मान्यवरांचा परिचय करून दिला. भारतीय विचारसाधनाचे अध्यक्ष किशोर शशीतल यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यवाह प्रदीप नाईक यांनी प्रास्ताविक केले. अमृता खाकुर्डीकर यांनी सूत्रसंचालन केले. विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी यांनी आभार मानले.यावेळी डॉ. मुकुंद दातार उपस्थित होते.

0 comments:

Post a Comment